मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या मुद्द्यावर थेट भूमिका मांडण्याऐवजी सूचक शब्दांत इशारा दिला. “पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. कोणताही निर्णय घाईत घेतला जाणार नाही,” असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना नवे वळण दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही गटांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एका बाजूला पक्षातील अनुभवी नेते आणि काही आमदार एकत्र येण्याची गरज व्यक्त करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमान, नेतृत्व आणि विचारसरणी यावरून मतभेदही स्पष्टपणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत सुनील तटकरेंचे विधान महत्त्वाचे मानले जात असून, ते पक्षाच्या आगामी दिशेचे संकेत देणारे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, शरद पवार गटाकडूनही या मुद्द्यावर हालचाली वाढल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही अधिकृत बैठकीची किंवा निर्णयाची घोषणा झालेली नाही.
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. त्यामुळे दोन्ही गट एकत्र येणार की स्वतंत्रपणे आपापली वाटचाल करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरेंच्या सूचक इशाऱ्यानंतर ही चर्चा अधिक तीव्र झाली असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठे निर्णय आणि घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण; सुनील तटकरेंचा सूचक इशारा, राजकीय वर्तुळात खळबळ